मुंबई : अर्थसंकल्पापाठोपाठ रिझर्व्ह बँकेनेही शेतकऱ्यांना खूशखबर दिली आहे. बँकेने द्वैमासिक पतधोरणात शेतकऱ्यांसाठी विनातारण कृषिकर्जाच्या रकमेत सुमारे ६० हजार रुपयांची वाढ केेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना एक लाखाऐवजी एक लाख ६० हजार रुपये कर्ज विनातारण मिळणार आहे.
रिझर्व्ह बँकेने गुरुवारी, सात फेब्रुवारी २०१९ रोजी जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणात हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आठवड्याभरात दुसऱ्यांदा खूशखबर मिळाली आहे. या निर्णयाने जवळपास १२ कोटी अल्प भूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. २०१० मध्ये शेतकऱ्यांच्या बिनव्याजी कर्जाची रक्कम एक लाख इतकी निश्चित करण्यात आली होती. आता त्यात चांगली वाढ झाली आहे.
शेतीसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चात झालेली वाढ आणि चलनवाढ यांचा विचार करून ही कर्ज मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अल्प-भूधारक शेतकऱ्यांना फायदा होईल. या संदर्भातील आदेश लवकरच जारी करण्यात येतील, असे रिझर्व्ह बँकेच्या निवेदनात म्हटले आहे.
याशिवाय शेती संबधित कर्जाचे प्रश्न सोडविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक अंतर्गत कामकाज समिती नेमण्याचे ठरवले असून, यामुळे पत व्यवस्थेची व्याप्ती छोट्या शेतकऱ्यांपर्यंत वाढवणे शक्य होईल. प्रादेशिक भिन्नतेनुसार दीर्घकालीन कृषी कर्जाच्या अडचणी वेगवेगळ्या असतात. त्यावर उपाययोजना आणि धोरणनिश्चितीसाठी ही समिती काम करेल, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.